अमळनेर (प्रतिनिधी) ऋषीपंचमीनिमित्त तालुक्यातील तापी व पांझरा नदीच्या संगमस्थळी शाही स्नानासाठी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील हजारो महिला भाविकांनी पहाटे पाच वाजेपासून सायंकाळपर्यत शाहीस्नान करून पुरातन कालीन “श्रीक्षेत्र कपिलेश्वर” त्रिपीडी महादेवाचे दर्शन घेतले. महिला भाविकांच्या गर्दीने हा परिसर फुलून गेला होता.
श्रीक्षेत्र कपिलेश्व मंदिर हे खान्देशातिल जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ऋषिपंचमीच्या निमित्त तापी पांझरा संगमस्थळी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ातील जवळपास दहा हजार महिला भाविकांनी स्नान व तापी पुजन करून महादेवाच्या त्रिपीडी शिवलिंगांचे मंदिरावर दर्शन घेऊन महामंडलेश्र्वर हंसानंद महाराज यांचे ऋषीपंचमी निमित्त आयोजित प्रवचनाचा लाभ घेतला. ऋषिपंचमीला संगमस्थळी अशा पावित्र्य तीर्थस्थानावर स्नान केल्याने, दुख पीडा दूर होऊन संकट नष्ठ होत असल्याची महिमा असल्याने खान्देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला भाविकांची गर्दी झाली होती. आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांनी दुपारी एक ते अडीच वाज़े दरम्यान ऋषिपंचमी या महात्म्यामावर प्रवचन केले. नंतर महिलांनी पुजेला सुरुवात केली. कपिलेश्वर तीर्थक्षेत्री ऋषिपंचमी निमित्त तापी पांझरा संगमस्थळी शाही स्नान, ऋषीूजन, तापी आरती, कथाप्रवचनसाठी मंदिरावर दर्शनासाठी जळगाव, भुसावळ, शिरपुर, धुळे, नंदुरबार अशा अनेक ठीकानाहुन महिला आल्या होत्या. यामुळे मंदिर परिसरला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.मंदिरावर पुजेच्या साहित्याची निम, मुडावद , अमळनेर येथील दुकाने थाटली होती. मंदिराचे अध्यक्ष विश्वस्त श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट मुडावद निम (तापी पांझरा संगम)व समस्त भक्त परिवार यांनी बाहेर गावाहुन येणाऱ्या भाविकांसाठी निवास व प्रवचन एकण्यास मंडप टाकून बसण्याची व विसाव्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीभाऊ तुकाराम पाटील, हवालदार सुनील तेली, मुकेश साळुंखे, फिरोज बागवान होमगार्ड, आदींसह याठिकानी महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला होता. कपिलेश्र्वर मंदिर संस्थानचे सचिव मगन पाटील, विश्वस्त तुकाराम पाटील, सी. एस. पाटील यांनी महिलांच्या नदीपात्रात स्नानासाठी विशेष काळजी म्हणून महिला स्वयंसेवकांकडून डोहात न उतरता काठावरच स्नान करण्याचा सुचना ध्वनिक्षेपकावर वारंवार केल्या गेल्याने मदतनीसांची मदत मिळाली. मात्र मंदिरापर्यंत जाणारी बस सेवा अमळनेर आगारातून बंद झाल्याने अनेक महिला भाविकांना नीम येथुन दिंडी प्रवास करत कपिलेश्र्वर मंदिरापर्यत आल्या. तर खाजगी वाहनचालकांनी थेट अमळनेर व कळमसरे- नीम येथुन प्रवासीमहिलांना मंदिरा पर्यंत सोडण्याचे सहकार्य केले. खाजगी वाहनांची संख्या मोठी असल्याने जवळपास दोन किलोमीटरवर लांबलचक रांगा लागल्या होत्या. तर नदीपात्रात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मंदिर संस्थानकडून महिला स्वयंसेवक तैनात केले होते.